३७. महिमा शुद्धाचरणाचा
या अध्यायात श्रीगुरुंनी पराशर ऋषींच्या उपदेशाच्या आधारे ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला. पूजाविधी सांगितला. पाषाणाची मूर्ती पूजिली तरी देव प्रसन्न होतो हे सांगितले. ब्राह्मणाच्या आचारधर्माचे पालन करणारा देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. भोजन नुसते केले तर उदरभरण होईल पण शास्त्रोक्त विधीने केले तर यज्ञकर्म ठरते.
ऐसा ब्राह्मणाचा आचार| सांगता झाला पराशर।
ऐकोनि समस्त ऋषीश्वर । तेणेंपरी आचरती ।।२७८।। अध्याय ३७
श्रीगुरु येथे सांगत महिमा शुद्धाचरणाचा
राम कृष्ण हरि, विठ्ठल दत्त उच्चारो वाचा! ध्रु.
संध्यावंदन, प्रतिमापूजन आवश्यक असते
ध्यान तसे मन लावुन भोजन अंगी लागते
मी कर्ता ना भोक्ता जाणे तो नर भाग्याचा!१
आहारावर असे नियंत्रण शाकाहार बरा
सात्विकतेला पोषक ऐसा दुग्धाहार बरा
पोषणातही परिसर घेतो वाटा मोलाचा!२
लाच न घ्यावी, पोटासाठी विकू नये विद्या
स्वाध्यायाने स्वावलंबने वेदांची विद्या
उच्चाराची शुद्धि जपत तो विषय कौतुकाचा!३
वंदनभक्ती मने जिंकण्या उपकारक ठरते
जे ठावे ते जनां शिकवता समाधान मिळते
अपुल्या गरजा कमी कराव्या सांगावा गुरुचा!४
द्वेषाने धगधगती ज्वाळा दाहकता जाचे
मत्सर करता चडफडाट हो पोटदुखी जाचे
झाडा द्यावा लागे अंती सगळ्या पापांचा!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment