३८. गुरुनिष्ठा उपयोगी आली
भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्रीगुरूंचा भक्त होता. मनात संकल्प होता, आपण श्रीगुरुंना भिक्षा घालावी. जवळ तिघांना पुरेल इतकीच शिधासामग्री होती. इतर शिष्यांनी भास्कराचा उपहास केला. श्रीगुरुंनी त्याला त्यादिवशी स्वयंपाक करून भिक्षा घालायला सांगितले. ब्राह्मणाने केलेला स्वयंपाक श्रीगुरुंनी कितीतरी ब्राह्मणांना पुरेल असा करवला. श्रीगुरुंनी त्याला आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य दूर होईल. तुला पुत्र पौत्र होतील.
झाकिले वस्त्र अन्नावरी। कमंडलु उदक घेऊनि करी ।
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळी । । ५० । । अध्याय ३८ ।।
भिक्षा घाल श्रीगुरु वदले, मन मोहरले । मन गहिवरले!ध्रु.
तुटपुंजे साहित्यच जवळी, काळजी न परि मना वाटली
स्वयंपाक सत्वर ही झाला, परब्रह्म जणु मला पावले!१
आरंभी उपहास साहिला, चला विप्रवर जेवायाला
आपणासवे श्रीगुरु जेवत, असे सांगता सगळे जमले!२
अन्न गुरुंच्या जवळ ठेवले, वस्त्राने होतेच झाकले
भरा भरा परि अन्न वाढले, पुरुन उरले । पुरुन उरले!३
तुझी गरीबी दूर जाहली, संतानाची चिंता सरली
औदार्या त्या नव्हती सीमा, धन्य धन्य सद्गुरु माऊली!४
कोमल भक्तिभाव जपावा, संशयास तिळ वाव न द्यावा
गुरुनिष्ठा उपयोगा आली, कृपा आगळी । कृपा जाणली!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment