Saturday, May 1, 2010

श्रीगुरुचरित्राची आरती

श्रीगुरुचरित्राची आरती

आरती गाऊ श्रीगुरुचरित्रा ।।ध्रु।।

ग्रंथ प्रासादिक लेखन मार्मिक,

मार्गाचा दर्शक भक्ताचा रक्षक,

अनंत अपार ज्ञानाच्‍या सत्रा ।।१।।

बोलका संवाद मना दे आल्‍हाद,

वाणीचा प्रसाद धादांत वेदांत,

गंगेच्‍या जलौघा परमपवित्रा ।।२।।

कथांची गुंफण चित्रांचे दर्शन,

सत्‍याचे मंडन पाखंड खंडन,

प्रत्‍येक अक्षर स्‍फुरवी मंत्रा ।।३।।

गाणगापुरात नरसोबावाडीत,

भिलवडी येथील औदुंबर क्षेत्रात,

निवास आपला अत्रिंच्‍या पुत्रा ।।४।।

शुचिता चिंतनी शुचिता वचनी,

शुचिता वर्तनी शुचिता स्‍पर्शनी,

सखोल चिंतन श्रीरामा अंगारा ।।५।।

५२. गुरुचरित्राचे पारायण कर.

५२.गुरुचरित्राचे पारायण कर.

श्रीगुरुचरित्राचे श्रवण करताना नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले. सिद्धमुनींना संतोष वाटला. अरे, भानावर ये, तुला प्राप्‍त झालेले ज्ञान तुझ्या मनातच ठेवू नकोस. बाकीचे लोक तरायला पाहिजेत ना. शिष्‍याच्‍या विनंतीवरून श्रीगुरुचरित्राचे सारच हाती आले. मन पवित्र असताना सर्व काळ श्रीगुरुचरित्र वाचावे, ऐकावे, गावे देखिल .

ऐसे भक्ता संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथुनि ।

पुष्‍पासनी बैसोनि । निरोप देती भक्तांसी ।।३४।।

इतुकिया अवसरीं । प्रसादपुष्‍पे आला चारी ।

मुख्‍य शिष्‍य प्रीतिकरीं। काढोनी घेती अवधारी ।।५९।। अध्‍याय ५२

नामधारका ऐकलीस तू, भावभरे गुरुचरितकथा,

प्रेमाश्रूच्‍या झरती धारा, हरल्‍या चिंता, तशा व्‍यथा ।।१।।

भानावर ये, तू तरलासी, तारायाचे भक्तजनां,

जे जे ठावे ते शिकवावे, चंदनगंधित करी मना ।।२।।

गुरुचरिताचे पारायण कर, धीर द्यायचा भीतांना,

सदैव सद्गुरु पाठ राखती, सत्‍यासाठी लढताना ।।३।।

हीन अमंगल ते ते जाळ, औचित्‍याचा विवेक पाळ,

दुष्‍टांचा हो कर्दनकाळ, रुद्राक्षांची माळा घाल ।।४।।

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्‍लभ दिगंबरा,

त्‍वरा करा त्‍वरा करा, भवसागर हा पार करा ।।५।।

संचारी मी, मीच भाषणी, विचारात मी वर्तनात मी,

गायनात मी, वादनात मी, घे अनुभूती आत्‍मा मी ।।६।।

दत्तासम देऊन टाकणे, काणाचे ना उसने घेणे,

वाढत जाते ज्ञान दिल्‍याने, उजळ कुडीला नाम जपाने ।।७।।

Friday, April 30, 2010

५१. गाणगापुरात आहे.

५१. गाणगापुरात आहे.

आता गाणगापुरात आपण गुप्‍त रहावे व लोकांना मात्र देहाने श्रीशैलयात्रेला जातो हे सांगावे. अमरजा संगमात नित्‍य स्‍नान करू, प्रेमाने गुप्‍तपणे मठातच राहु असे ते म्‍हणाले. आम्‍ही निजस्‍थानाला जातो, तेथे पोचल्‍यावर खुणा म्‍हणून फुले पाठवू असे ते म्‍हणाले. गायनात माझे स्‍मरण करा असे आवर्जून सांगितले. श्रीगुरुंचा महिमा व श्रीगुरुचरित्र म्‍हणजे जणू कामधेनुच आहे.

ऐसे सांगोनि तयासी। निघाले स्‍वामी श्रीपर्वतासी।

भक्त परतानि मठासी। आले चिंतीत मनात ।।२५।।

चिंतती रिघती मठात, तेथे दिसती श्रीगुरुनाथ,

लोक झाले विस्मित । म्‍हणती वस्‍तू त्रिमूर्ति ।।२६।। अध्‍याय ५१

चिंता नका करु बाळांनो,

गाणगापुरात आहे,

जरी न दिसलो मठात येथे,

गुप्‍तपणाने राहे ।।ध्रु।।

दृश्‍याला भुलतो अज्ञानी,

आत्‍मतत्‍व ओळखती ज्ञानी,

वियोग हासत साहे ।।१। ।

प्रसाद शेवंतीची सुमने,

घेऊन अपुल्‍या गावी जाणे,

स्‍मरता भेटत राहे ।।२।।

वेष जरी हा संन्‍यासाचा,

मी पुरुषांचा तसा स्‍त्रीयांचा,

शुचित्‍व बनुनी राहे ।।३।।

रुद्राक्षांची गळ्यात माळा,

तेज चढविते तीच तपाला,

रविप्रभा मी आहे ।।४।।

गुरुचरिताला गीती गाता,

हळवेपण अंतरात भरता,

आईचे मन आहे ।।५।।

शिक्षक माझा वसा चालवी,

गुरुवंदना प्रेमे शिकवी,

विवेक जागविताहे।।६।।

दत्त दत्त नित घोकत जावे,

वाडी औदुंबरहि घडावे,

स्‍वाभाविकता आहे ।।७।।

५०. व्‍याधी बरी करावी स्‍वामी.

५०. व्‍याधी बरी करावी स्‍वामी.

तो धोबी पुन्‍हा जन्‍मला आणि बिदरचा बादशाह झाला. पण रजकाच्‍या जन्‍माच्‍या आधीचे भोग भोगायचे राहून गेले होते. बादशहाच्‍या मांडीवर फोड आला. ते दुखणे बरे होईना. या जन्‍मी नदीतीरीच स्‍वामी भेटले। यवन बादश्‍ाहा कळवळून म्‍हणाला

चतुश्चत्‍वारिशतं कोश देखा। राजा पातला दिवसें एका ।

पापविनाशी तीर्थी निका । अवलोकीतसे श्रीगुरुसी ।।२२७।। अध्‍याय ५०

व्‍याधी बरी करावी स्‍वामी, व्‍याधी बरी करावी ।।ध्रु।।।

गतजन्‍मीचा धोबी होतो,

या जन्‍मीचा राजा होतो,

माया नरा वाचवी ।।१।।

मांडीवर परि फोडच आला,

दु:ख असे कुणी टोचत भाला,

युक्ती काय करावी ? ।।२।।

म्‍लेंच्‍छ मी परि द्वेष न ठावा,

खुदा मला सर्वत्र दिसावा,

वाट दाखवा बरवी ।।३।।

संगमावरी भेट जाहली,

आस दुजी ना कसली उरली,

कुडी कृपांकित व्‍हावी ।।४।।

लागे हुरहुर सुखही वाटे,

फुले जाहली पथि जे काटे,

किमया कशी कळावी ? ।।५।।

Thursday, April 29, 2010

४९. गुरुगीता

४९. गुरुगीता

सिद्धांनी गुरुगीता शंभुमुखातून जशी आली तशी नामधारकास सांगितली. सर्व लोकांचा उद्धार व्‍हावा यासाठी हिमालयाची कन्‍या पार्वती हिने शंकरांना प्रश्न विचारला त्‍याचे उत्तर म्‍हणजे गुरुगीता. देहधारी जीव कोणत्‍या मार्गाने ब्रह्मरुप होईल ? शंकर म्‍हणाले - गुरुशिवाय अन्‍य परब्रह्म नाही. हा गुरुच्‍या महतीचा अध्‍याय आहे. गु हा वर्ण गुणातीत अवस्‍था दर्शवितो. तर रु हां वर्ण रुपापलीकडची अवस्‍था सुचवितो.

पार्वती पुशिलें ईश्वराप्रती। ईश्वरे सांगितले कवणे रीती।
जेणे लोक उद्धरती। ते निरोपावें दातारा ।।९।।
पूर्वी कैलासशिखरी । बैसला होता त्रिपुरारि।
प्रश्न करी शैल्‍यकुमरी। समस्‍त लोक उद्धरावया ।।१३।। अध्‍याय ४९।।

श्रीगुरुगीता ऐकावी। श्रीगुरुगीता उमजावी ।।ध्रु।।।
शिव जे कथिती उमा ऐकते,
श्रवणाने ती समरस होते,
शंका समूळ निरसावी।।१।।
मंत्ररुप झाली गुरुगीता,
आश्वासन ती देते पतिता,
वाट भक्तीची चालावी ।।२।।
अनुग्रहाने, अभ्‍यासाने,
जिज्ञासेने समर्पणाने,
गुरु ही पदवी लाभावी ।।३।।
शिल्‍पकार गुरु अनुपम ऐसा,
चेला घडवी आपण जैसा,
परिसा ती सर ना यावी ।।४।।
गुरुगौरव गानात रमावे,
गुरुगौरवगानात विरावे,
दुधात साखर मिसळावी ।।५।।

४८. स्‍वामी तुमचे वाक्‍य मला प्रमाण

४८. स्‍वामी तुमचे वाक्‍य मला प्रमाण

पर्वतेश्वर नावाच भक्त शूद्र होता. त्‍याने कायावाचामने गुरुभक्ती केली. त्‍याच्‍या शेतावरून जेव्‍हा जेव्‍हा श्रीगुरु जात तेव्‍हा तेव्‍हा साष्‍टांग नमस्‍कार घालत असे. श्रीगुरु शेताजवळ आले, म्‍हणाले ऐकणार असलास तर सांगतो, मी परत येईपर्यंत पीक कापून टाक. गुरुवचन आपल्‍याला प्रमाण म्‍हणून त्‍याने सर्व पीक कापून टाकले. त्‍याची गुरुनिष्‍ठा पाहून गुरु संतोषले. गाव नापीक ठरला पण शेतकर्‍याला पीक दसपट लाभले.

विनोदे तुज सांगितले। तुवा निधरि कापिलें।

म्‍हणे तुमचे वाक्‍य भलें। तेचि कामधेनु मज ।।३३।।

ऐसे ऐकोनि श्रीगुरु म्‍हणती। निर्धार असेल तुझे चित्ती ।

होईल अत्‍यंत फळश्रुती। चिंता न करी म्‍हणोनियां ।।३४।। अध्‍याय ४८।।

वाहत मी हीच आण, श्रीगुरुवचन मज प्रमाण ।।ध्रु।।।

वर्ण शूद्र, शेत कसत, श्रीगुरु जधि येत जात,

भावभरे त्‍यांस नमित, करित सदा नामगान ।।१।।

शेत चांगले पिकु दे, भक्त एवढेच वदे,

गुरुदेवा तुज वंदे, आज्ञांकित मी अजाण ।।२।।

आज्ञा जर पीक काप, भंग तिचा घोर पाप,

मम मनास नाही ताप, सुस्‍वर मी गात गान ।।३।।

कामधेनु आज्ञा ही, ना ममता या देही,

सदय मला करि विदेही, भक्तीतुन निघत ज्ञान ।।४ ।।

दृढभक्ती दैन्‍य कुठे ? लाभ जिथे हानि कुठे,

सत्‍य जिथे, विजय तिथे, देवविले विपुल दान ।।५।।

Wednesday, April 28, 2010

४७. श्रीगुरु सात ठायी गेले

४७ . श्रीगुरु सात ठायी गेले

गाणगापुरात असताना दिवाळीचा सण आला। वेगवेगळ्या गावात राहणार्‍या सात शिष्‍यांनी आपल्‍याच घरी भिक्षेला येण्‍याचा आग्रह धरला. स्‍वामी तुम्‍ही कुणालाही निराश करू नये जे सांगाल ते आम्‍ही करू. साती जणांची मी तुझ्याच घरी येतो अशी समजूत घालून त्‍यांना आपापल्‍या घरी पाठविले. आम्‍ही इथेच राहणार आहो असे गाणगापुरात म्‍हटले. श्रीगुरुंनी आठ रुपे घेतली व साती शिष्‍यांकडे पूजेला गेले. तरी पण वाडीत ते होतेच.

आठ रुपे झाले आपण । अपार महिमा नारायण ।
सात ठायीही गेले आपण। गाणगापुरी होतेची ।।२६।। अध्‍याय ४७।।

गाणगापुरी असुनि आपण आठरुप जाहले,
श्रीगुरु सात ठायी गेले ।।ध्रु।।।
प्रत्‍येकाचा गाव वेगळा,
प्रत्‍येकाचा हट्ट आगळा,
सर्वांच्‍या घरी कैसे येणे?
कुणी न हे जाणले ।।१।।
उच्‍च नीच ना भेद पाहिला,
जवळ दूरचा भेद न केला,
मायमाउली सगळ्यांचे गुरु,
प्रतिघरी ते जेवले ।।२।।
गाणगापुरा नाही त्‍यजिले,
आनंदरुपे भरले उरले,
मायेला सीमा न आईच्‍या,
सजल जलद वर्षले ।।३।।
गावोगावी अशी दिवाळी,
गाणगापुरी तरी दिवाळी,
आलो होतो प्रतिसदनी मी
ध्‍यानी आणुन दिले ।।४।।
सिद्धेशाला वश सिद्धी ही
ॐ गुरु ऐसी साक्ष प्रत्‍यही,
नवलाईची नवलकथाही,
स्‍मरता मन हलले ।।५।।